शरिराने मी घरात असलो, तरी मनाने मात्र वानखेडे स्टेडियमवर - सूर्यकुमार यादव

Thote Shubham
मुंबई : यंदा २९ मार्चपासून यंदाच्या आयपीएलला सुरुवात होणार होती. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना होणार होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील अनेक महत्त्वाचे कार्यक्रम, परिषदा, रद्द करण्यात आल्या आहेत.

आयपीएलप्रमाणेच जगातल्या इतर अनेक मोठ्या स्पर्धाही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या. यंदाच्या वर्षी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढच्या वर्षी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा करण्याआधीच बीसीसीआयने आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. देशातली सध्याची परिस्थिती बघता १५ एप्रिलपासूनही आयपीएल सुरु होण्याची शक्यता कमीच आहे.

लॉक डाऊनमुळे मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव आयपीएलला खूपच मिस करतोय. याबाबतचं ट्विट सूर्यकुमार यादवने केलं आहे. शरिराने मी घरात असलो, तरी मनाने मात्र वानखेडे स्टेडियमवर आहे. हे दिवसही जातील. घरात राहा, सुरक्षित राहा, असं ट्विट सूर्यकुमार यादवने केलं आहे.

२०१९-२० च्या रणजी मोसमात सूर्यकुमार यादवने मुंबईच्या टीमचं नेतृत्व केलं. सौराष्ट्रविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये सूर्यकुमारने शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीनंतरही मॅच ड्रॉ झाली आणि सौराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये गेली. बंगालविरुद्धच्या फायनलमध्ये पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या आघाडीमुळे सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी पटकावली.

Find Out More:

Related Articles: