तरी आमचे सरकार खचणार नाही, 5 वर्षे काम करतच राहील – गुलाबराव पाटील

Thote Shubham

‘कोणाचेही फोन टॅपिंग करणे चुकीचे आहे. या गोष्टीचे कुणीही समर्थन करणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार खचावे, म्हणून भाजपकडून निरनिराळे प्रयत्न सुरू आहेत. फोन टॅपिंग हा त्यातलाच एक भाग आहे,’ अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर केली.

 

ते जळगाव येथे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या काळातही फोन टॅपिंगचे असे प्रकार घडले आहेत. ही एक प्रकारची रणनीती असते. मात्र, कुणाचेही फोन टॅपिंग करणे चुकीचेच आहे. हा प्रकार करण्यामागे कोण आहे, हे लवकरच समोर येईल, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आमचे सरकार खचणार नाही. 5 वर्षे काम करतच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

तसेच भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. फोन टॅपिंग आणि स्नूपिंग झालेल्या नेत्यांमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

दरम्यान, विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप सरकारने सरकारी यंत्रणेचा वापर करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी इस्रायलमधून आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप खुद्द दिग्विजय सिंग यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

 

Find Out More:

Related Articles: