मोदी सरकारकडून महाराष्ट्राची आर्थिक कोंडी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘सामना’ दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या कारभारावर टीकेचे आसूड ओढले. केंद्र सरकार राज्याची आर्थिक कोंडी करतेय? या थेट प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ते काही जाणूनबुजून करताहेत असं मी काही म्हणत नाही असे उत्तर दिले.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘केंद्राकडून जर का सगळेच्या सगळे पैसे वेळच्या वेळेवर मिळत गेले तर मला शेतकऱ्यांना अधिक पैसे वेळेवर देता येतील असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. केंद्र सरकार नेमके कोणत्या दिशेने जाऊ इच्छिते हे केंद्राला सुद्धा कळलेले नाही. एकूणच सर्व गोंधळ आहे,’ असा टोला ठाकरेंनी लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘केंद्र सरकारकडून जशी मदत मिळायला हवी, तशी ती मिळालेली नाही. केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या पैशांमध्ये दिरंगाई होतेय. त्यामुळे अनेक योजना लांबणीवर पडतायत,’ असा आरोप केंद्र सरकारवर उद्धव ठाकरेंनी केला.
दरम्यान, दिलेल्या शब्दाला भाजप जागला असता, तर मी मुख्यमंत्रिपदावर बसलो नसतो. बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल आहे, असे सांगताना आता घेतलेली जबाबदारी कुणालाही न दुखावता पार पाडणार असल्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.