पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गरज भासल्यास कर्जही काढू : चंद्रकांत पाटील

सांगली आणि कोल्हापुरात आलेल्या भीषण महापुरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. अनेक नागरिकांचे घर पडले आहे. याच पार्श्‍वभूमीवर आता शहरी आणि ग्रामीण भागाला पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. प्रत्येक पूरग्रस्ताचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. त्यासाठी गरज भासल्यास कर्जही काढू अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात 4 लाख 53 हजार लोकांना पुरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून आता पुरात कोणीही अडकले नाही. तसेच राज्यात 500 च्या वर निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. या निवारा केंद्रात 3 लाखापेक्षा जास्त लोक आश्रयाला आहेत. कोल्हापूरमध्ये 2 कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. पुराचा फटका बसलेल्या गावच पुनर्वसन सहा ते आठ महिने चालणार आहे. ते पुढे म्हणाले की, 6 हजार 800 कोटीमध्ये शेती नव्याने उभा करावी लागणार आहे. पूरग्रस्त शेतकर्यांच्या कर्ज माफीसाठी प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला होणार्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला जाणार आहे. कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त गावे दत्तक घेण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ति पुढे येत आहेत.

त्यामध्ये पंढरपूर देवस्थान 5 आणि नाना पाटेकर यांची नाम संस्था 2 गावं दत्तक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थितीमध्ये घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थांनी आमच्या गावाला मदत पाहिजे. असे सांगून मदतीचे आलेल्या ट्रक मधील साहित्य खाली करून घेतले आहे. त्यामुळे मदत करणार्यांनी प्रशासनाशी समन्वय साधून मदत पाठवावी. असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी विशेष पथके नेमून त्यावर लक्ष देण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

Find Out More:

Related Articles: