प्रामाणिकपणे निवडणूक लढलो, जो निर्णय होता तो लोकांचा निर्णय होता - रोहित पवार

Thote Shubham

पुणे : “मी प्रामाणिकपणे निवडणूक लढलो. लोकांनी आपल्या ताब्यात ती निवडणूक घेतली होती. त्यामुळे जो निर्णय होता तो लोकांचा निर्णय होता. तरीसुद्धा भाजपचे पराभवी उमेदार राम शिंदे कोर्टात गेले. जसा त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तसाच आमचाही आहे. मात्र, यातून काही निष्पण्ण होणार नाही, असा विश्वास मला वाटतो”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडेचे आमदार रोहित पवार यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिली 

 

आमदार रोहित पवार यांना कोर्टाने समन्स बजावले आहे. माजी मंत्री आणि भाजपचे नेते राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या प्रचारावर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोर्टाने कारवाई करत रोहित पवार यांना समन्स बजावले. मात्र, हे समन्स आपल्यापर्यंत पोहोचले नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

 

“कोणत्याही प्रकारचे समन्स आलेले नाहीत. लोकांच्या बोलण्यानुसार कळतंय की, राम शिंदे कोर्टात गेले आहेत. कशासाठी गेले आहेत? त्यांनी काय मुद्दे मांडले? हे एकदा नोटीस हाती लागल्यावर समजेल. त्यानंतर मी यावर भाष्य करेन. मात्र, सध्यातरी समन्य माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही”, असं रोहित पवार यांनी सांगितलं (Rohit Pawar on mumbai high court summons).

 

“विजय पराजय हे स्वीकारायचे असतात. विजयी होतात ते काम करायला सुरुवात करतात. राम शिंदेंचा पराभव झाला. ते कोर्टात गेले. ठिक आहे, त्यांचा कोर्टावर विश्वास असेल. ते त्यांची बाजू मांडतील, आम्ही आमची बाजू मांडू”, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

 

यामध्ये राजकारण असू शकतं का? असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला असता “तो त्यांचा व्यक्तीगत विषय आहे. पण लोकशाहीमध्ये लोकांचा कौल हा स्वीकारावा लागतो. त्यांना कोर्टाच्या मदतीने काही म्हणायचं असेल तर ते त्याठिकाणी मांडत राहतील. लोकांचा कौल काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

 

राम शिंदे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रचार करत असताना बदनामी केल्याचा आरोप केला आहे. याबाबत पवार यांना विचारले असता, “समन्स वाचल्याशिवाय या विषयावर बोलणं म्हणजे आपण अंदाज बांधून बोलतोय. न्यायालयात काय सुरु आहे हे जाणून घेत नाही तोपर्यंत याविषयी बोलू शकत नाही. न्यायव्यवस्थेचं कामं योग्य पद्धतीने सुरु असतं. त्यामुळे त्यात काय लिहिलंय हे वाचल्याशिवाय अंदाज लावत मला बोलता येणार नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

Find Out More:

Related Articles: